रस्ते!!

June 25, 2009

रस्त्यांचे स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व असते….जसे की उत्साही रस्ते, तरुण रस्ते, बंडखोर रस्ते, निसर्गरम्य रस्ते, नटलेले रस्ते, विजयी रस्ते…एक ना अनेक अशी विशेषणे आहेत की जी तुम्ही रस्त्यांना लावलीत तर तुम्हाला त्या विशेषणाचा अर्थ पूर्ण करणारा असा एकतरी रस्ता आठवेलच. दलाल स्ट्रीट पासून ते वॅल स्ट्रीट पर्यंत, शिवाजी रोड पासुन ते राजपथ पर्यंत आणि सिल्क रूट पासून ते ग्रॅन्ट ट्रंक रोड पर्यंत प्रत्येक रस्त्यांची एक आयकॉनीक ईमेज असते.

मागच्या लेखातील अलास्काची हरवलेली वाट पुन्हा एकदा तुडवण्याचा प्रयत्न या लेखात करतोय. तस म्हंटले तर अलास्का हे रस्त्यावरुनच बघायचा प्रदेश आहे. एक शहर ते दुसरे शहर तुम्ही विमानाने गेलात तर तुम्हाला अलास्कातील बर्फाच्छादीत पर्वतांची, ग्लॅशीयर्स ची, सुचीपर्णी वृक्षांची, ओळखच होणार नाही. अलास्काला जायच्या आधी मला देवदत्त म्हणाला होता….”ऍन्करेज ते वालदीज सात तासांचा रस्ता आहे…वाटेत मध्ये ३०० मैल एकही गाव नाही आणि पेट्रोल पंप तर नाहीच नाही….पुढेही तसेच….पण रस्ता अत्यंत निसर्गरम्य आहे. इट्स वर्थ डुईंग इट.”…आणि खरच….मला अलास्कातील सगळेच रस्ते आनंद देऊन गेले.

अलास्कातील हायवेज हे द्रुतगती महामर्ग नसून, नागमोडी वळनांचे, द-याखो-यातून जाणारे रस्ते आहेत. त्यामुळे ते आपल्याल तेथील नसर्गच्या अगदी जवळ घेऊन जातात. ( मला कधी कधी जुना मुंबई-पुणे रस्ता जास्त आवडतो. नवीन एक्सप्रेसवे मध्ये आपल्याला कवितेतल्या “खंडाळ्याचो घाटाची” ओळख नाही होत)

परवा नॅशनल जिओग्राफिकच्या वेबसाईट वर “Drives of Lifetime: World’s Greatest Scenic Routes” असा एक लेख वाचला. जगातले अत्यंत निसर्गरम्य रस्त्यांची त्यामध्ये महिती दिलेली होती. ती यादी बघायच्या आधीच मला खत्री होती की त्यात अलास्कातील एक तरी रस्ता असेलच. …आणि Route-1 तर नक्किच असेल. आणि खरोखरच यादीत Route-1 ऍन्करेग ते सुवर्ड चा रस्ता होता (सोबत जोडलेला नकाशा बघा).

Seward_Highway

Route-1 हा अलास्कातील मुख्य शहर ऍन्करेजला दक्षिणेकडील सुवर्डशी जोडतो. याचे वैशिष्ट्य असं की ह्याच्या एका बाजुला पॅसिफिक महासागर आणि दुस-या बाजुला बर्फाच्छादित डोंगर आहेत. पॅसिफिक महासागराच एक निमुळता भाग आत आला आहे ज्याल टर्गेनियन आर्म (Turganian Arm) असे म्हणतात. रुट-१ ह्या टर्गेनियन आर्मला वळसा घालून जातो. त्यामुळे हा ड्राईव्ह समुद्रकडेनी, नागमोडी वळणावळणाच्या रस्त्याने जातो. सुवर्ड आणि त्याजवळचा केनाई भाग (Kenai Peninsula) इथे असलेल्या अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. वटेत गर्डवुड(girdwood), व्हिट्टियर (Whittier) अशी अजून काही जरुर भेट देण्यासारखी गावे सुद्धा आहेत. या पोस्ट बरोबर काही फोटोज जोडत आहे.

कधी अलास्काला जाणे झाले तर या रुट -१ ला जरूर भेट द्यावी!

Seward Highway, Alaska

Seward Highway, Alaska

अलास्काची ट्रीप करुन आता जवळ जवळ साडेतीन महीने होत आले. बरेच दिवस अलास्कातील अनुभवांबद्दल लिहावे असे मनात आहे. पण नक्की कसे लिहावे हे लक्षात येत नाही. नेहमी प्रमाणे एका टिपीकल प्रवासवर्णनासारखे तर अजिबात लिहायचे नाही आहे. म्हणजे असं बघा मी अमुक-अमुक तारखेला विमानात बसलो, आणि हे-हे पाहिले इत्यादी. थोडक्यात ‘माझी अलास्का सफर’ या नेहमीच्य पध्दतीपेक्षा वेगळ्या पध्दतीने अलास्का कसा मांडावा हे काही सुचतच नाही. शेवटी अलास्काचे अनुभव शीळे होण्याच्या आधीच ते जमतील तसे मांडायचा प्रयत्न करतोय.

अलास्काबाबत पूवीची ओळख म्हणजे सातवी-आठवीच्या भूगोलात टुंड्रा आणि तैगा प्रदेशाच्या पट्ट्यात येणारे उत्तर अमेरीकेतील राज्य किंवा तिथे रात्री दिसणा-या अरोरा बोरीयोलीसच्या संदर्भात ऐकली होती तेवढीच. पण गेली काही वर्षे तिकडे शिकायला गेलेल्या मित्र-मैत्रिणींकडून तिथल्या निसर्गसौदर्याचे जे वर्णन ऐकत होतो, त्याने अलास्काला जाण्याची उत्सुकता exponentially वाढतच गेली. सॅक पाठीला अडकवली, कॅमेरा गळ्यात घातला आणि एकट्यानेच पाच दिवस अलास्कात जाऊन गाडी दामटवली. हो…अगदी दामटवलीच म्हणावे लागेल! कारण लोकवस्ती कमी असल्यामुळे तिकडे रस्त्यावर जेमतेम चार गाड्या.  त्यामुळे पु. लं. चे गाडी “चालवणे” हे पुणेरी क्रियापद जरी गाडी तशी “चालवता” येत असली तरीही मला इथे अजिबात वपरता येणार नाही. भाड्याने घेतलेली पावरबाज गाडी, मोकळे रस्ते आणि जोडीला आर्टिक प्रदेशाचा २४ पैकी २१ तासांचा लख्ख सुर्यप्रकाश.  मग वगमर्यादेची पर्वा न करता गाडी सुसाट दामटवायचा मला मोहन रानडे कसा नाही होणार? ( “मोह नरा नडे” ची फोड करुन त्याचा “मोहन रानडे” करण्याची मिस्कील कल्पना आमच्या बाफना सरांची! अर्थात तो मोह मला कुठे नडला मात्र नाही ही गोष्ट निराळी…) त्यात एकटाच असल्यामुळे मनात येईल तिथे आणि मनात येईल तेव्हा कशीही आणि कुठेही गाडी हाकण्याची…माफ करा…दामटवण्याची मुभा. त्यामुळे या कॉक्रीटच्या इंटरस्टेट हायवेजच्या जाळ्यांपेक्षा मला हे डोंगर-द-यात, हिमनदींमध्ये आणि सुचीपर्णी जंगलात मनसोक्त भटकंती करणारे अलास्कातील रस्ते प्रचंड आवडले. म्हणुनच अलास्काबाबतचा पुढचा लेख फक्त अलास्कातील रस्त्यांवर समर्पीत करायचे ठरवले आहे. माझ्या ब्लॉगची गाडी आता आलास्काच्या रस्तत्यांवर दामटवत आहे…आता पुन्हा भेटूया ऍन्करेज-अलास्काला!

 (क्रमश:)

ratnakar.jpg 

काही आठवड्यांपूर्वी न्यू यॉर्क मराठी मंडळाने सादर केलेले “उद्गार” नावाचे नाटक पाहिले.  या मराठी मंडळांचे एक ठराविक स्वरूप असते. इथे किमान १०-२० वर्ष “settle” झालेली हौशी मंडळी….. अमेरिकन छाप दाखवत जमेल तसं आणि जमेल तेवढं मराठी बोलणारी त्यांची मुले आणि आम्ही साता समुद्रापार असलो तरीही मुलांवर मराठी संस्कार कसे करतो हे दाखवायल आतूर असलेले त्यांचे पालक. त्यामूळे जास्त अपेक्षा न ठेवता ते नाटक बघायला गेलो होतो. पण माझा घोर अपेक्षाभंग झाला, नाटक खूपच छान होते! अगदी व्यवसायीक नाटकांबरोबर तुलना केली तर खूपचं प्रसंसनीय आणि उत्साहवर्धक प्रयत्न म्हणता येईल. दिग्दर्शन, नेपथ्य आणि २-३ कलाकारांची कामे सुंदर झालेली होती. त्या भर म्हणून नाटकाला भक्कम आधार होता तो रत्नाकर मतकरींच्या कथेचा!

रत्नाकर मतकरी हे नाव ऐकलं की आठवतात त्या त्यांच्या गूढकथा. भूत, पुनर्जन्म, भास असे विषय असले तरीही रत्नाकर मतकरींच्या कथांमध्ये एक वेगेळेपण असते. त्या कधीच भीतीदायक वाटत नाहीत, त्याउलट विचार करायला प्रवृत्त करतात. उदारणार्थ त्यांनी लिहिलेली “खेकडा”. दोन लहान मित्र-मैत्रिणींचं विश्व, त्यात फक्त सावत्र आई आणि वडिलांची काय ती भर….मोजून चार पात्र….पण काय सुरेख लिहिली आहे कथा! त्या मुलीचा मृत्यू झाला की कसले वेगळेच वळण घेते. मग अशा प्रसंगी एक खेळ खेळावासा वाटतो. कथेचा शेवट वाचायच्या आधी जरा थोडा वेळ विचार करायचा, की नक्की कोणता शेवट सर्वात चांगला वाटेल. चार-पाच वेगेवेगळ्या प्रकारचे शेवट आठवले की मग पुस्तक पुढे वाचायचे. तो नेहमीप्रमाणे एकदम वेगळा तर असतोच…पण त्याहूनही जास्त म्हणजे त्या शेवटाचा पुरेपूर आनंद घेता येतो.

 अजून एक उदारण म्हणजे “गहिरे पाणी”. याच नावाने त्यांच्य कथेंवर आधारीत एक मालिका लागायची काही वर्षांपूर्वी टिव्हीवर….आठवतं? नाटकातील कलाकार जेव्हा स्वतःचे व्यक्तीमत्व विसरून आपण नाटकातील पात्र म्हणूनच जगायला लागतो ती कथा, किंवा एक पन्नाशीतल्या उद्योगपतीला एक तरूणी स्वप्नात दिसते तेव्हाचा प्रसंग. विचार करायला गेले तर अगदी टिपिकल हिंदी चित्रपटांच्या कथा वटतात. पण या सगळ्या कथांचे शेवट किती वेगळे मांडलेत मतकरींनी! कदाचीत कथा नेहमीच्याच असतात पण आपण त्यांचा तसा कधी विचारच केलेला नसतो.

 त्यांच्या प्रत्येक गूढकथेत असे नाविन्य कसं असत, हे एक गूढच आहे!  सतत प्रयोग करण्याची वृत्ती व नाविन्य सांभाळणा-या त्यांचा कथा जितक्या प्रसिद्ध आहेत, तितकीच त्यांची नाटके आणि बालकथा.  “घर तिघांचे हवे”, “चार दिवस प्रेमाचे” ही नाटकं तर खूप लोकप्रीय झाली. 

त्या दिवशीच्या नाटकाच्या निमित्ताने रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचून सार्थक झालेल्या क्षणांची आठवण झाली, आणि त्याबरोबर आठवण झाली ती अजूनही वचायच्या राहून गेलेल्या कथांची. यादी वाढतचं आहे…..बघूया कधी जमते वाचायला ते!

*************************************************************************************************

छायाचित्रासाठी या संकेतस्थळाचे आभार.

shawshank.jpg

आज माझा वूस्टर मधला शेवटचा दिवस…आज इथे मुंबईसारखा धो धो पाऊस पडला.
अगदी चींब भिजलो…..मस्त वाटले !!

*********************************
घन घन माला नभी दाटल्या (….मनी दाटल्या)
कोसळती धारा…

*****************************************

(Photo From: Shawshank Redemption)

cvraman.gif

 नोबेल पारितोषिक वितरणानंतर चंद्रशेखर वेंकट रामन यांना एका पार्टीमध्ये दारु घेण्याचा आग्रह करण्यात आला होता. त्यावर ते मिस्किलपणे म्हणाले ‘तुम्ही अल्कोहोल वर रामन इफ्फेक्ट बघितला आहात, पण कृपया रामन वर अल्कोहोल इफ्फेक्ट बघू नका!‘ रामन इफ्फेक्ट हा organic liquids वरील light scattering वर आधारित असल्यामुळे उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकली.

अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे रामन यांना त्यांच्या संशोधनावर येवढा विश्वास होता की त्यांनी स्वीडनमधील नोबेल पारितोषिक समारंभासाठीचे तिकीट त्यांना पारितोषिक मिळाल्याचे घोषीत होण्याच्या जवळजवळ एक वर्ष आधी काढले होते!

रामन इफ्फेक्ट व्यतिरीक्त त्यांनी अजूनही अनेक विषयांवर संशोधन केले होते. तबल्यावर काळा शाईचा डाग असल्यामुळेच त्यातून harmonics निर्माण होतात हे देखिल त्यांनी दाखवले. ड्रम्स व तबल्यामध्ये त्यामूळेच मूलभूत फरक असतो.

pirates.jpg

 मध्यंतरी एक मस्त चित्रपट पाहिला….’Pirates of the Silicon Valley’. नविन महितीचा दरवाजा एकदम उघडला की कसे होते ना ………….तसे झाले काहीतरी. तेव्हापासून रोज इंटरनेटवर Steve Jobs आणि Bill Gates संबंधीत माहिती शोधायचे वेडच लागले आहे.

हा चित्रपट Microsoftचा बिल गेटस  आणि Apple चा स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनावर आणि त्यांच्यामधील स्पर्धेवर आधारित आहे.  मुख्य म्हणजे पात्रांची व सर्व वस्तवातील संदर्भांची नावे जशीच्या-तशी ठेवली आहेत …जसे Machintosh, Windows वगैरे. त्यामुळे चित्रपट पाहतानाच आपण नकळत आपल्या आवती भवतीच्या गोष्टींशी त्याचा संबंध लावायला लागतो. चित्रपटची सुरुवात स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेटस यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून होते. पण कथेतील मुख्य विषय हा Apple आणि Microsoft मधील स्पर्धा आहे!

Mouse चे तंत्रज्ञान सर्वात पहिल्यांदा Xerox च्या प्रयोगशाळेने शोधले होते म्हणे. पण दूर्दैवाने त्यांच्या सा.मो.सा.ला (साहेबाच्या मोठ्या साहेबाला) तो प्रकार काय आहे हे झेपलेच नाही आणि त्यांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. मग ते तंत्रज्ञान Xerox कडून Steve Jobs ने विकत घेतले आणि Machintosh बाजारात आणला. बिल गेटस तेव्हा IBM च्या PC साठी Operating System तयार करत होता. त्याने मग स्टीव्ह जॉब्सला हरब-याच्या झाडावर चढवले आणि Apple कडूने हे तंत्रज्ञान चक्क चोरले!!..Now can you beat that? आपण जे Windows रोज वापरतो किंवा आत्ता तुम्ही हा लेख ज्या Windows Operating System च्या मदतीने बघताय त्याचा उदय या चोरीमधून झाला आहे म्हणे!! ( आणि वर हे लोक अशिआयी देशांमध्ये पायरसी चालते म्हणून आरडा ओरडा करत असतात.)

चित्रपट स्टीव्ह जॉब्सवरतीच केंद्रीत आहे. त्यामुळे त्याची आवड-निवड, सवयी, विचित्र वागणे इत्यादी कलाकाराने खूप छान वठवले आहे. सर्वांनी हा चित्रपट जरूर बघवा व ज्या लोकांना स्टीव्ह जॉब्सबद्दल माहिती आहे, त्यांना हा चित्रपट विशेष आवडेल व तो बघून झाला की झपाटलेल्या माणसासारखे नेटवर त्याच्यासंबंधी माहिती शोधतील.

असंच काल स्टीव्ह जॉब्स आणि Apple वरती शोधले असता Apple-Machintosh  च्या जाहिरातींचा हा संग्रह मिळाला. संगणकाला मानवरुप देऊन Apple ने खूप दर्जेदार जाहिरात केली आहे. मला सर्वात जास्त आवडली ती त्यातील PC, Mac आणि जपानी कॅमेराची जाहिरात!

पण अगदी आवर्जून बघावे ते स्टीव्ह जॉब्सचे हे भाषण.

परंतू, दुस-या बाजूने विचार केला तर असे दिसते, की स्टीव्ह जॉब्स ने मायक्रोसॉफ्ट विरुद्ध खूप प्रचार केला. Windowsचे पहिले काही व्हर्जन्स Machintosh वरून छापले असतील असे जरी मानले…तरीपण त्यानंतरचा विकास हा त्यांनी स्वतःहून केला आहे. शिवाय Apple ने सुद्धा सगळे काही स्वतःहून थोडीच विकसीत केले आहे. त्यांना पण Xerox ची मदत घ्यावीच लागली ना. पण म्हणून मायक्रोसॉफ्टने कधी ऍपल विरुद्ध अशी जाहिरातबाजी केल्याचे ऐकीवात नाही! नेटवर शोध घेतल्यास, स्टीव्ह ने नेहमी मायक्रोसॉफ्ट वर तोंडसूख घेतले आहे, पण बिल गेटसने असे कधी जाहिरपणे नाही केले..(उदारणार्थ ह्या दोन मुलाखती: स्टीव्ह आणि बिल गेटस.)

अर्थात स्टीव्ह जॉब्सचे वक्तृत्व मात्र वाखण्याजोगे आहे. १९८३ साली Machintosh बाजारात आला तेव्हाचे स्टीव्हचे हे भाषण आणि जाहिरात जरुर बघावी!

सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे, Appleचे काही शेअर सध्या मायक्रोसॉफ्टच्या मालकीचे आहेत! शेवटी काय हो, सर्व काही धंदा या शब्दाखाली मोडते…आणि आजच्या स्पर्धेच्या जगात कोणी ना कोणी “ध” चा “मा” हा करणारच! मग तो स्टीव्ह जॉब्स असो वा बिल गेटस…………

(वरील विचार हे लेखकाचे वैयक्तीक विचार असून, या लेखामध्ये कोणा विरुद्ध अपप्रचार करायचा कोणताही हेतू नाही.)

(व्हिडिओज च्या संकेतस्थळांसाठी Youtube चे विशेष आभार!)

काही विशेष वाक्यांचे किंवा शब्दांचे आपल्या आठवणींशी इतके अतूट बंधन असते, की ते शब्द ऐकताच आपण त्या आठवणींच्या विश्वात रमून जातो. हनुमान जयंती माझ्या मनात अशाच काहीशा आठवणी घेऊन येते. लहानपणीच्या मसूरमध्ये घालवलेल्या दिवसांच्या आठवणी….

मसूर….कराड शहराजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेले एक खेडं! लहानपणाची काही सुंदर वर्षे मी या ठिकाणी घालवली. मसूरचा इतिहास मात्र खूप जुना….जगदाळेंचे हे देशमुखीचे गाव. जगदाळे आणि आफळे ही मसूरचीपेटंटेडआडनावे म्हणावी लागतील. पण मसूरला ख-या अर्थाने वेगळेपण आले ते रामदास स्वामींनी आकरा मारुतीं मंदिरांपैकी एक मंदिर मसूरमध्ये बांधल्यामुळे. छोटेखानी मंदिर..त्यासमोर सारवलेले आंगणएकदम साधासुधा थाट. मारुतीची शेंदूर लावलेली मोठ्ठी मूर्ती.

रामदासी पंथातील शेंबेकर गुरुजी मसू्रच्या मारुती आणि राम मंदिराची व्येवस्था बघायचे. त्यांना आम्ही सगळी मुले शेम्बेकरबुवा किंवा रामदासी काकाम्हणायचो. शेंबेकरबुवा आम्हा सर्व मुलांची दर रवीवारी सकाळी शिकवणी घ्यायचे. पण ही एक अगदी वेगळी शिकवणी होती. रामदास स्वमींनीमनाचे श्लोकमध्ये सांगितलेला उपदेशच ते आम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि उदाहरणे देऊन सांगायचे. त्यांची शिकवण्याची पध्दत खूप निराळी होतीते आम्हा मुलांमध्ये अगदी आमच्या वयाचे होत असतं….त्यामुळे सर्व मुलांची रामदासी काकांशी एकदम छान मैत्री असे. काहीही झाले तरी आम्ही दर रवीवारची राममंदिरातील शिकवणी कधीही चुकवायचो नाही. ऎन बाजारपेठेत असलेले मसूरचे राममंदिरसुद्धा खूप छान होते.

हनुमान जयंतीच्या दिवशी तर मसूरमध्ये दंगाच असायचा. मारुती मंदिरासमोर मोठा मंडप उभारलेला असे. सकाळी अगदी भल्या पहाटे सगळे जण तेथे जमायचे. पुजाआणि त्यानंतर रामदासी काकांचे त्यांच्या खास शैलीत किर्तन असायचे. मग आम्ही सगळी बच्चेकंपनी त्यांच्याबरोबर गावभर भिक्षा मागायला जायचो. प्रत्येक घरासमोर उभेराहून मोठ्या आवाजातजय जय रघुवीर समर्थम्हणायला काय धमाल यायची! पहाटे सुरु झालेला हा कार्यक्रम दुपारपर्यंत चालायचा. मग परत दुपारी मारुतीमंदिरात यायचे…. जेवणावर आडवा हात मारून आम्ही सर्वजण अखेरीस घरी परतायचो.

मसूरहून पुण्याला मुक्काम हलवला तेव्हा खूप वाईट वाटले होते. पण तेव्हा माझ्या खेडवळ लहान मनाला पुण्याच्या शहरी जीवनाचे खूप कौतुक होते. त्यामुळे पुण्यात रमायला जास्त वेळ लागला नाही. पण इतकी वर्षे होऊनसुद्धा कधीकधी मन मसूरच्या वाटेला आपसूक जातेच. मध्ये एकदा शेंबेकरबुवा पुण्याला घरी आले होते. पण त्यांनंतर त्यांची कधी भेट झाली नाही…….

समर्थाचीये सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?”…………

एखाद्या शुक्रवारी सर्वांनी एकत्र जमायचे आणि पार्टी करायची हा इथे शिकणा-या आम्हा मित्रांचा अगदी आवडता ठरलेला कार्यक्रम. दंगा, मस्ती, नाच-गाणे माणसांनी भरलेले घरपिणारे पीत असतात, तर पिणारे नुसतेच कोक किंवा स्प्राईटचे घोट घेत असतात. मग थोडे वातावरण थंड झाले की एक जण गिटार काढतो. परवा पण आगदी असंच झाले….आणि मग गिटारच्या साथीने आमच्या आवडत्या गाण्यांची मैफ़िल सुरु झाली.

सुरुवात झाली ती डूबा डूबा रेहता हुं पासनं..मग जरा नज़र हटाके देखो, तुss पुकार लो, दो दिल मिल रहे है वगैर गाणी झालीपण मैफ़िल -या अर्थाने रंगली ती मन्ना डे यांचे मेरे प्यारे वतनगाणे लावल्यावर.

सलील चौधरींचे अफाट संगीत, त्यात गुलजारचे शब्द म्हणजे दुधात साखरआणि वर हे सर्व कमी होतं की काय असं वाटावे असा मन्ना डें चा अप्रतीम आवाज़…… भारतात असताना हे गाणे मी शंभर वेळा ऐकले असेल आणि तेव्हाही मला ते खुप आवडायचे. पण इथे साता समुद्रापार आल्यावरती हे गाणे ऐकले ना, की त्या आवाजातलादर्द-या अर्थाने समजतो. गाण्यातला शब्द अन शब्द तुमच्या मनाला जाऊन भीडतो, अगदी व्याकुळ करुन सोडतो.

मेरे प्यारे वतन, मेरे बिछडे चमन,

तुझपे दिल कूर्बान।तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू,

तू ही मेरी ज़ान॥

जसे जसे गाणे पुढे जाते तसा तसा प्रत्येक जण एका वेगळ्याच दुनियेत जायला लागतोकेवढे सुरेल संगीत, नुसतं देशप्रेमालच नाही तर अगदी खोलवर जाऊन भारताशी जडलेल्या सर्व आठवणींना प्रवृत्त करणारे बोल.

तेरे दामन से जो आए, उन हवाओं को सलाम,

चूम लू मैं उस जुबां को जिसपे आए तेरा नाम,

सबसे प्यारी सुबह तेरी, सबसे रंगी तेरी शाम,

तुझपे दिल कूर्बान॥१॥

मला एकदम आठवले ते मागे न्यु यॉर्कला गेलो होतो तेव्हाचा प्रसंग. एकदा आम्ही कुठेतरी रांगेत उभे होतो, तर रस्त्यावर व्हायोलीन वाजवणा-या एका माणसाने, आम्ही भारतीय आहोत हे बघूनजन गण मनवाजवले होते. आम्ही सगळे त्याच्यावर एकदम खुष! त्याला बक्षीस तर दिलंच शिवाय त्याचे तोंड भरून कौतुक पण केले. मग मला पटले ..खरचं ..”चूम लू मैं उस जुबां को जिसपे आए तेरा नाम“. हे सगळे आठवते आहे तोवर मन्ना डेंनी पुढचे कडवे सुरु केले

मां का दिल बनके कभी सीनेसे लग जाता है तू,

और कभी नन्हीसी बेटी बनके याद आता है तू,

जीतना याद आता है मुझको, उतना तडपाता है तू,

तुझपे दिल कूर्बान॥२॥

या काडव्याबद्दल तर काय लिहावे. “आईया एकाच शब्दात प्रत्येक माणसाच्या इतक्या ओल्या भावना जडलेल्या असतात की हे वाक्यच सगळे काही बोलून जाते..” जीतना याद आता है मुझको, उतना तडपाता है तू“.

पण सर्वात जास्त त्रास देते ते गाण्याचे शेवटचे कडवे..

छोडकर तेरी जमीं को दूर पहुचे है हम,

फ़िरभी है यहीं तमन्ना तेरे ज़र्रो की कसम,

हम जहां पैदा हुये, उस जगह ही निकले दम,

तुझपे दिल कूर्बान॥३॥

आधीच्या कडव्यांनी जो माहौल निर्माण केला आहे त्याचा पर्मोच्च बिंदु म्हणजे हे शेवटचे कडवे. “हम जहां पैदा हुये, उस जगह ही निकले दमभारतापसून दूर आलेल्या लोकांनाच यातल्या -या भावना समजतील.

सहाजीकच गाणे संपल्यावर आम्ही सर्व जण या गाण्याच्या नेशेमध्ये बराच वेळ बेहोष झालो होतो….थॅंक्यू मन्ना डे, गुलज़ार आणि सलील चौधरी!!

मकर संक्रांत हा सण आला की लोकांना पहिली आठवण येते ती तिळगुळाची. पण गेले तीन वर्ष मकर संक्रांत मला आठवण करते ती एका व्यक्तीचीमुरुगाची!! मुरुगा हे माझ्या कंपनीच्या गेस्ट-हाऊस मधल्या नोकराचे नाव. पण मुरुगा माझा नोकर नव्हता तर माझा एक खूप चांगला मित्र होता.

तेव्हा मी नुकताच पदवीधर झालो होतो... पहिली नोकरी…. कंपनीने साईटच्या कामासाठी मला मैसूरजवळ नंजनगुडला पाठवले होते. नवी नोकरीनवी उमेद..त्यात पहिल्यांदा घराबाहेर पडलो होतो..मनात नवा प्रदेश बघायची इच्छा होतीनवीन लोकांना भेटण्याची उत्सुकता होती. गेस्ट-हाऊस मध्ये पहिल्याच दिवशी माझी मुरुगाशी भेट झाली. तो साधारण माझ्याच वयाचाचेह-यावर अगदी अस्सल तमिळ छाप. मुरुगा तिथे स्वयपाकघरात आचारी आणि वाढपी म्हणुन काम करायचा. गेस्ट-हाऊस जरी कर्नाटकात असले तरी तिथे कामाला असलेली सर्व लोकं तमिळ होती. मुरुगाही त्यातलाच एक. त्याचे मुळ गाव सत्यमंगलम. ( वीरप्पनही सत्यमंगलमच्याच जंगलात रहायचा म्हणे! )

मुरुगा आणि माझ्यामध्ये तसं म्हंटले तर वय सोडुन काहीच सारखे नव्हते. अगदी भाषा सुद्धा! मला तमिळ अजीबात यायची नाहीआणि त्याला तमिळसोडुन दुसरी कोणतीच भाषा यायची नाही. तरीपण आम्ही एकमेकांशी संवाद साधायचोचक्क मुक्या माणसांसारखे हातवारे करुन! त्याचे आणि माझे खूप छान जमायचे. मी रोज कामावरुन आलो की तो गरम गरम उत्तपा-चटणी द्यायचा. त्या त्याच्या हातच्या लज्जतदार उत्तपा-चटणीची चव अजूनही माझ्या जीभेवर रेंगाळते आहे. मग कधी आम्ही दोघे बाहेर फ़िरायला जायचो..तर कधी गेस्ट-हाऊसच्या पाय-यांवर बसायचो. कधी कंपनीत फेरफटका मारायचो तर कधी मंदीरात जायचो. मंदिरावरुन लक्षात आलेनंजनगुडला एक मोठे शंकराचे मंदिर आहे आणि नदीवर एक अप्रतीम घाट पण आहे.

मुरुगाचे आणि माझे येवढे का जमायचे मला माहित नाही. कदाचित तिथे बाकीचे सर्व लोकं वयाने मोठे होते म्हणुन असेल…नाहीतर तिथे मी एकटाच तमिळ न येणारा माणुस या उत्सुकतेपोटी असेल. एकदा एक मजेदार किस्सा झाला होता. मला तमिळ येत नसल्यामुळेमुरुगाहे कार्तिक स्वामींचे नाव आहे हे मला महिती नव्हते. मला वाटायचे की त्याचे नाव मुर्गाआहे. त्यामुळे मी आपला त्याला मुर्गा या नावानेच हाक मारायचो आणि याच्या आई-वडिलांनी याचे नाव असे का ठेवले असा मनात विचार करायचो. मग एके दिवशी हिंदी येणा-या एका तमिळ ईंजीनियरने मला बोलवून सांगितले की त्याचे नाव मुर्गा नसूनमुरुगाआहे आणि ते तमिळमध्ये देवाचे नाव आहे म्हणुन. हे ऎकुन तर मी एकदम जीभच चावली. पण मुरुगाला यातले काहीच कळाले नाहीकारण त्याला तरी हिंदी कुठे यायचे :-) .

आपल्या इथे मकर संक्रांत म्हणजेच तमिळनाडुतला पोंगल. त्या दिवशी सकाळी मुरुगाने काय अफलातून पायसम बनवले होते की विचारु नकाजोडीला गरम आणि नरम उत्तपा होताचशिवाय चार प्रकारच्या चटण्यासाम्बार ..एकुण त्या दिवशीचे जेवण म्हणजे अगदी पर्वणीच होती. मग त्यानंतर पोंगलची उरलेली दुपार व संध्याकाळ मी आणि मुरुगा एकत्र होतो. सण असल्यामुळे मुरुगालाही संध्याकाळच्या कामाची सुट्टी होती. आम्ही मंदिरात गेलो..बाजारात गेलो..मग मी मुरुगाला नेट- कॅफे दाखवले. खूप फिरलो. पण नंतर संध्याकाळी तो एकदम उदास झाला. त्याला मला काहीतरी सांगायचे होते पण मला काही केल्या कळत नव्हते. शेवटी एका हिंदी येणा-या माणसाकडुन कळाले की तो दुस-या दिवशी त्याच्या घरी सुट्टीसाठी जात होता आणि दोन आठवड्यांनी परतणार होता म्हणुन. माझेही नंजनगुडमधील काम तीन-चार दिवसात संपणार होते. म्हणजे मी यापुढे मुरुगाला भेटायची शक्यता खुपच कमी. मला प्रचंड गहिवरुन आले होते त्या रात्री.

तेव्हापासुन दर पोंगलला मला मुरुगाची आठवण येते( हो..आजकाल मी संक्रांतीलाही पोंगल म्हणु लागलो आहे) . दर वर्षी नंजनगुडला जायचे ठरवतो पण दर वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने ते राहुन जाते. आशा वेळेस मनात जे वाटते ना ते गदीमांनी किती छान शब्दात लिहीले आहे.

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट

एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ

क्षणिक तेंवी आहे बाळा, मेळ माणसांचा

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.

528797560qxbxii_ph.jpg 

या फोटोमधील घाट कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो आहे ना? ..ही नदी……..हे मंदिर.

 नक्की कुठेतरी पाहिली आहे ही जागा! ………पण कुठे?

अहो……हे तर स्वदेस मधले “चरणपूर”! आता आठवले ना तुम्हाला…..

या गावाचे खरे नाव “मेणवली”. वाई पासून धोम धरणाकडे जायला लागले की अवघ्या ४-५ कि. मी.  वर मेणवली लागते, अगदी छोटेसे टुमदार गाव.  नाना फडणीसांनी १८व्या शतकात इथे एक मोठा वाडा, घाट आणि मेणेश्वराचे व विष्णुचे मंदिर बांधले.  एका बाजुला खंबीरपणे उभा असलेला पांडवगड तर दुसऱ्या बाजुला पाचगणीला घेऊन जाणारा पासरणीच्या घाटाचा रस्ता, आणि त्या दोघांमधून वाहणारी कृष्णा नदी. कृष्णेवर बांधलेला हा घाट पाहिला की मेणवलीच्या प्रेमातच पडायला होते. इथली शांतता आणि निवांतपणा मनाला एका क्षणात भावतो.

नाना फडणीसांच्या वाडयाला मोठे ऎतिहासिक महत्व देखिल आहे. त्याचे कारण इथे मिळालेले पेशवेकालीन कागदपत्रे आणि दस्तावेज. नाना फडणीसांच्या वेळेपासून जतन केलेल्या या कागदपत्रांना इतिहासकार “मेणवलीचे दफ्तर” असे म्हणतात. घाटावर चिमाजीअप्पांनी वसईच्या पोर्तुगीजांविरुद्धच्या विजयानंतर आणलेली एक पंचधातूची मोठी घंटा आहे. अशीच अजुन एक घंटा तुम्ही थेऊरच्या अष्टविनायक गणपती मंदिरात नक्की बघितली असेल. त्याव्यतिरीक्त वाड्यामध्ये असलेली तैलचित्रे पण खूप सुंदर आहेत. मेणवलीचे आणखी एक महत्व म्हणजे १९४२ च्या “भारत छोडो” आंदोलनच्या वेळेस नानासाहेब पाटिलांनी स्थापन केलेले “पत्री सरकार” पण आपल्या कारभारासाठी मेणवली गावाचा वापर करायचे.

पण सध्याच्या काळात मेणवली गाजते आहे ते बॉलिवुडवाल्यांमुळे.  स्वदेसच्या आधी इथे सर्जा, युद्ध, जिस देस मे गंगा रेहता है, गंगाजल, मृत्युदंड आणि गूंज उठी शहनाई या चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे, तर संजय लीला भंसाळींचा “बाजीराव-मस्तानी” व हॉलिवुडचा “द ईंव्हेडर” या इंग्रजी चित्रपटाचे काम पण इथेच होणार आहे.

महाबळेश्वर-पाचगणीच्या वाटेवर, वाईहून अगदी दहा मिनीटांच्या रस्त्यावर असलेले मेणवली हा कृष्णेच्या काठावरचा कराडसारखाच अजुन एक दागिना.

twotemples.jpg 

( फोटोमध्ये उजवीकडचे मंदिर मेणेश्वराचे तर डावीकडे पाठीमागे असलेले मंदिर विष्णुचे आहे. )

 माहिती व छायाचित्रांसाठी या संकेतस्थळांचे आभार.

१) http://ramrao2.tripod.com/Menavali.html

२)  http://outdoors.webshots.com/photo/1528797560074388040QxBXii 

३) http://www.nanachimenavli.com/