संत तिकडोजीच्या कवितांमध्ये एक वेगळीच गोडी असते. या स्वछंद चालीच्या,  साधी रचना असलेल्या आणि सरळ सोप्या अर्थाच्या कविता पाचवी सहावीच्या पुस्तकात हमखास सापडतील. मला सर्वात जास्त आवडली ती  त्यांची या झोपडीत माझ्या ही  कविता.  वेबवर न मिळाल्यामुळे, त्याची प्रत इथे उपलब्ध करावी असे वाटले…म्हणून हा प्रयत्न.

 राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली

ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे

प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला

भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने

आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा

कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे

शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥

 - संत तुकडोजी महाराज.

कराडचा प्रितीसंगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे. उत्तरेहून वाहत येणरी कृष्णा आणि दक्षिणेहून येणरी कोयना. दोघी अगदी आमने-सामने येऊन एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावातले नाही. पण कराडचा प्रितीसंगम मात्र त्याला अपवाद.

तसं म्हंटले तर कृष्णा आणि कोयना सख्या बहिणीच की..महाबळेश्वर दोघींचेही उगमस्थान. पण दोघींमध्ये केवढा फ़रक!! थोरली बहिण कृष्णा समजुतदारपणे वागणारी. ही लहान मुलीसारखी डोंगर-दऱ्यांमध्ये जास्त खेळत बसत नाही. हिला घाई असते ती लवकर पठारावर यायची. तहानलेल्या पिकांना पाणी पाजून ताजे-तवाने करण्याची. तर धाकटी बहिण कोयना म्हणजे महा खोडकर….. डोंगरांमध्ये खेळणे हिला फार आवडते. हिचे सगळे मित्र पण असेच रांगडेप्रतापगड, मकरंदगड आणि वासोटा. जावळीचे खोरे म्हणजे यांचे अंगण. पण धाकटी असली तरी अंगात जोर फारअर्ध्या महाराष्ट्राला वीज पुरवते म्हणे ही!

तर अशा या दोघी. अगदी भिन्न स्वभावाच्या पण सख्या बहिणी….जबाबदारीने वागणारी कृष्णा तर डांबरट कोयना, ऊसशेती समृध्द करणारी कृष्णा तर भात पिकवणारी कोयना, वाईच्या गणपतीचे पाय धुणारी कृष्णा तर प्रतापगडावरच्या भवानी मातेला नमन करणारी कोयना. पण कराडला आल्यावर दोघींचाही ऊर दाटून येतो आणि धावत येऊन दोघी एकमेकींना आलिंगन देतात.

उत्तर भारतात जे स्थान गंगा-यमुनेला तेच महाराष्ट्रात कृष्ण-कोयनेलाआणि कराड म्हणजे इथलेप्रयाग‘. कृष्णेचा किंवा कोयनेचा एकेरी उच्चार मराठी माणुस सहसा करत नाही. आपण नेहमीकृष्ण-कोयनाअसेच म्हणतो. उदारणार्थ हे महाराष्ट्रगीत..

रेवा वरदा, कृष्ण-कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.

किंवा आपण शाळेत शिकलेली ही कविता..

कशासाठी पोटासाठी
देशासाठी देशासाठी
गंगा आणि गोदेसाठी
कृष्ण-कोयना यांच्यासाठी

कराडचा प्रितीसंगम इतका सुंदर आहे की उत्तरालक्ष्मी पासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत सगळेच जण याच्या सौंदर्याला भुलले. त्यामुळेच या संगमावर जसे उत्तरालक्ष्मीचे मंदिर आहे तसेच यशवंतराव चव्हाणांची समाधी पण आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनीराजा शिवछत्रपतीमध्ये कराडच्या प्रितीसंगमाचे फार सुरेख वर्णन केले आहे.

या प्रितीसंगमाच्या पण दोन वेगवेगळ्या छटा आहेत. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात याचे शांत आणि कोमल रुप दिसते तर पावसाळ्यात याने खवळलेल्या समुद्रासारखे रौद्र रुप घेतलेले असते. मराठी माणसाने निदान एकदा तरी कराडच्या या प्रितीसंगमाला जरूर भेट द्यावी.