मकर संक्रांत हा सण आला की लोकांना पहिली आठवण येते ती तिळगुळाची. पण गेले तीन वर्ष मकर संक्रांत मला आठवण करते ती एका व्यक्तीचीमुरुगाची!! मुरुगा हे माझ्या कंपनीच्या गेस्ट-हाऊस मधल्या नोकराचे नाव. पण मुरुगा माझा नोकर नव्हता तर माझा एक खूप चांगला मित्र होता.

तेव्हा मी नुकताच पदवीधर झालो होतो... पहिली नोकरी…. कंपनीने साईटच्या कामासाठी मला मैसूरजवळ नंजनगुडला पाठवले होते. नवी नोकरीनवी उमेद..त्यात पहिल्यांदा घराबाहेर पडलो होतो..मनात नवा प्रदेश बघायची इच्छा होतीनवीन लोकांना भेटण्याची उत्सुकता होती. गेस्ट-हाऊस मध्ये पहिल्याच दिवशी माझी मुरुगाशी भेट झाली. तो साधारण माझ्याच वयाचाचेह-यावर अगदी अस्सल तमिळ छाप. मुरुगा तिथे स्वयपाकघरात आचारी आणि वाढपी म्हणुन काम करायचा. गेस्ट-हाऊस जरी कर्नाटकात असले तरी तिथे कामाला असलेली सर्व लोकं तमिळ होती. मुरुगाही त्यातलाच एक. त्याचे मुळ गाव सत्यमंगलम. ( वीरप्पनही सत्यमंगलमच्याच जंगलात रहायचा म्हणे! )

मुरुगा आणि माझ्यामध्ये तसं म्हंटले तर वय सोडुन काहीच सारखे नव्हते. अगदी भाषा सुद्धा! मला तमिळ अजीबात यायची नाहीआणि त्याला तमिळसोडुन दुसरी कोणतीच भाषा यायची नाही. तरीपण आम्ही एकमेकांशी संवाद साधायचोचक्क मुक्या माणसांसारखे हातवारे करुन! त्याचे आणि माझे खूप छान जमायचे. मी रोज कामावरुन आलो की तो गरम गरम उत्तपा-चटणी द्यायचा. त्या त्याच्या हातच्या लज्जतदार उत्तपा-चटणीची चव अजूनही माझ्या जीभेवर रेंगाळते आहे. मग कधी आम्ही दोघे बाहेर फ़िरायला जायचो..तर कधी गेस्ट-हाऊसच्या पाय-यांवर बसायचो. कधी कंपनीत फेरफटका मारायचो तर कधी मंदीरात जायचो. मंदिरावरुन लक्षात आलेनंजनगुडला एक मोठे शंकराचे मंदिर आहे आणि नदीवर एक अप्रतीम घाट पण आहे.

मुरुगाचे आणि माझे येवढे का जमायचे मला माहित नाही. कदाचित तिथे बाकीचे सर्व लोकं वयाने मोठे होते म्हणुन असेल…नाहीतर तिथे मी एकटाच तमिळ न येणारा माणुस या उत्सुकतेपोटी असेल. एकदा एक मजेदार किस्सा झाला होता. मला तमिळ येत नसल्यामुळेमुरुगाहे कार्तिक स्वामींचे नाव आहे हे मला महिती नव्हते. मला वाटायचे की त्याचे नाव मुर्गाआहे. त्यामुळे मी आपला त्याला मुर्गा या नावानेच हाक मारायचो आणि याच्या आई-वडिलांनी याचे नाव असे का ठेवले असा मनात विचार करायचो. मग एके दिवशी हिंदी येणा-या एका तमिळ ईंजीनियरने मला बोलवून सांगितले की त्याचे नाव मुर्गा नसूनमुरुगाआहे आणि ते तमिळमध्ये देवाचे नाव आहे म्हणुन. हे ऎकुन तर मी एकदम जीभच चावली. पण मुरुगाला यातले काहीच कळाले नाहीकारण त्याला तरी हिंदी कुठे यायचे :-) .

आपल्या इथे मकर संक्रांत म्हणजेच तमिळनाडुतला पोंगल. त्या दिवशी सकाळी मुरुगाने काय अफलातून पायसम बनवले होते की विचारु नकाजोडीला गरम आणि नरम उत्तपा होताचशिवाय चार प्रकारच्या चटण्यासाम्बार ..एकुण त्या दिवशीचे जेवण म्हणजे अगदी पर्वणीच होती. मग त्यानंतर पोंगलची उरलेली दुपार व संध्याकाळ मी आणि मुरुगा एकत्र होतो. सण असल्यामुळे मुरुगालाही संध्याकाळच्या कामाची सुट्टी होती. आम्ही मंदिरात गेलो..बाजारात गेलो..मग मी मुरुगाला नेट- कॅफे दाखवले. खूप फिरलो. पण नंतर संध्याकाळी तो एकदम उदास झाला. त्याला मला काहीतरी सांगायचे होते पण मला काही केल्या कळत नव्हते. शेवटी एका हिंदी येणा-या माणसाकडुन कळाले की तो दुस-या दिवशी त्याच्या घरी सुट्टीसाठी जात होता आणि दोन आठवड्यांनी परतणार होता म्हणुन. माझेही नंजनगुडमधील काम तीन-चार दिवसात संपणार होते. म्हणजे मी यापुढे मुरुगाला भेटायची शक्यता खुपच कमी. मला प्रचंड गहिवरुन आले होते त्या रात्री.

तेव्हापासुन दर पोंगलला मला मुरुगाची आठवण येते( हो..आजकाल मी संक्रांतीलाही पोंगल म्हणु लागलो आहे) . दर वर्षी नंजनगुडला जायचे ठरवतो पण दर वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने ते राहुन जाते. आशा वेळेस मनात जे वाटते ना ते गदीमांनी किती छान शब्दात लिहीले आहे.

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट

एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ

क्षणिक तेंवी आहे बाळा, मेळ माणसांचा

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.