भीमरूपी महारुद्रा…..
April 3, 2007
काही विशेष वाक्यांचे किंवा शब्दांचे आपल्या आठवणींशी इतके अतूट बंधन असते, की ते शब्द ऐकताच आपण त्या आठवणींच्या विश्वात रमून जातो. हनुमान जयंती माझ्या मनात अशाच काहीशा आठवणी घेऊन येते. लहानपणीच्या मसूरमध्ये घालवलेल्या दिवसांच्या आठवणी….
मसूर….कराड शहराजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेले एक खेडं! लहानपणाची काही सुंदर वर्षे मी या ठिकाणी घालवली. मसूरचा इतिहास मात्र खूप जुना….जगदाळेंचे हे देशमुखीचे गाव. जगदाळे आणि आफळे ही मसूरची “पेटंटेड” आडनावे म्हणावी लागतील. पण मसूरला ख-या अर्थाने वेगळेपण आले ते रामदास स्वामींनी आकरा मारुतीं मंदिरांपैकी एक मंदिर मसूरमध्ये बांधल्यामुळे. छोटेखानी मंदिर..त्यासमोर सारवलेले आंगण…एकदम साधासुधा थाट. मारुतीची शेंदूर लावलेली मोठ्ठी मूर्ती.
रामदासी पंथातील शेंबेकर गुरुजी मसू्रच्या मारुती आणि राम मंदिराची व्येवस्था बघायचे. त्यांना आम्ही सगळी मुले ‘शेम्बेकरबुवा‘ किंवा ‘रामदासी काका‘ म्हणायचो. शेंबेकरबुवा आम्हा सर्व मुलांची दर रवीवारी सकाळी शिकवणी घ्यायचे. पण ही एक अगदी वेगळी शिकवणी होती. रामदास स्वमींनी “मनाचे श्लोक” मध्ये सांगितलेला उपदेशच ते आम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि उदाहरणे देऊन सांगायचे. त्यांची शिकवण्याची पध्दत खूप निराळी होती…ते आम्हा मुलांमध्ये अगदी आमच्या वयाचे होत असतं….त्यामुळे सर्व मुलांची रामदासी काकांशी एकदम छान मैत्री असे. काहीही झाले तरी आम्ही दर रवीवारची राममंदिरातील शिकवणी कधीही चुकवायचो नाही. ऎन बाजारपेठेत असलेले मसूरचे राममंदिरसुद्धा खूप छान होते.
हनुमान जयंतीच्या दिवशी तर मसूरमध्ये दंगाच असायचा. मारुती मंदिरासमोर मोठा मंडप उभारलेला असे. सकाळी अगदी भल्या पहाटे सगळे जण तेथे जमायचे. पुजा…आणि त्यानंतर रामदासी काकांचे त्यांच्या खास शैलीत किर्तन असायचे. मग आम्ही सगळी बच्चेकंपनी त्यांच्याबरोबर गावभर भिक्षा मागायला जायचो. प्रत्येक घरासमोर उभेराहून मोठ्या आवाजात “जय जय रघुवीर समर्थ” म्हणायला काय धमाल यायची! पहाटे सुरु झालेला हा कार्यक्रम दुपारपर्यंत चालायचा. मग परत दुपारी मारुतीमंदिरात यायचे…. जेवणावर आडवा हात मारून आम्ही सर्वजण अखेरीस घरी परतायचो.
मसूरहून पुण्याला मुक्काम हलवला तेव्हा खूप वाईट वाटले होते. पण तेव्हा माझ्या खेडवळ लहान मनाला पुण्याच्या शहरी जीवनाचे खूप कौतुक होते. त्यामुळे पुण्यात रमायला जास्त वेळ लागला नाही. पण इतकी वर्षे होऊनसुद्धा कधीकधी मन मसूरच्या वाटेला आपसूक जातेच. मध्ये एकदा शेंबेकरबुवा पुण्याला घरी आले होते. पण त्यांनंतर त्यांची कधी भेट झाली नाही…….
“समर्थाचीये सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?”…………
April 4, 2007 at 8:18 am
good post as usual
May 7, 2009 at 7:04 pm
O3eELd comment4 ,