गहिरे पाणी: रत्नाकर मतकरी
August 7, 2007
काही आठवड्यांपूर्वी न्यू यॉर्क मराठी मंडळाने सादर केलेले “उद्गार” नावाचे नाटक पाहिले. या मराठी मंडळांचे एक ठराविक स्वरूप असते. इथे किमान १०-२० वर्ष “settle” झालेली हौशी मंडळी….. अमेरिकन छाप दाखवत जमेल तसं आणि जमेल तेवढं मराठी बोलणारी त्यांची मुले आणि आम्ही साता समुद्रापार असलो तरीही मुलांवर मराठी संस्कार कसे करतो हे दाखवायल आतूर असलेले त्यांचे पालक. त्यामूळे जास्त अपेक्षा न ठेवता ते नाटक बघायला गेलो होतो. पण माझा घोर अपेक्षाभंग झाला, नाटक खूपच छान होते! अगदी व्यवसायीक नाटकांबरोबर तुलना केली तर खूपचं प्रसंसनीय आणि उत्साहवर्धक प्रयत्न म्हणता येईल. दिग्दर्शन, नेपथ्य आणि २-३ कलाकारांची कामे सुंदर झालेली होती. त्या भर म्हणून नाटकाला भक्कम आधार होता तो रत्नाकर मतकरींच्या कथेचा!
रत्नाकर मतकरी हे नाव ऐकलं की आठवतात त्या त्यांच्या गूढकथा. भूत, पुनर्जन्म, भास असे विषय असले तरीही रत्नाकर मतकरींच्या कथांमध्ये एक वेगेळेपण असते. त्या कधीच भीतीदायक वाटत नाहीत, त्याउलट विचार करायला प्रवृत्त करतात. उदारणार्थ त्यांनी लिहिलेली “खेकडा”. दोन लहान मित्र-मैत्रिणींचं विश्व, त्यात फक्त सावत्र आई आणि वडिलांची काय ती भर….मोजून चार पात्र….पण काय सुरेख लिहिली आहे कथा! त्या मुलीचा मृत्यू झाला की कसले वेगळेच वळण घेते. मग अशा प्रसंगी एक खेळ खेळावासा वाटतो. कथेचा शेवट वाचायच्या आधी जरा थोडा वेळ विचार करायचा, की नक्की कोणता शेवट सर्वात चांगला वाटेल. चार-पाच वेगेवेगळ्या प्रकारचे शेवट आठवले की मग पुस्तक पुढे वाचायचे. तो नेहमीप्रमाणे एकदम वेगळा तर असतोच…पण त्याहूनही जास्त म्हणजे त्या शेवटाचा पुरेपूर आनंद घेता येतो.
अजून एक उदारण म्हणजे “गहिरे पाणी”. याच नावाने त्यांच्य कथेंवर आधारीत एक मालिका लागायची काही वर्षांपूर्वी टिव्हीवर….आठवतं? नाटकातील कलाकार जेव्हा स्वतःचे व्यक्तीमत्व विसरून आपण नाटकातील पात्र म्हणूनच जगायला लागतो ती कथा, किंवा एक पन्नाशीतल्या उद्योगपतीला एक तरूणी स्वप्नात दिसते तेव्हाचा प्रसंग. विचार करायला गेले तर अगदी टिपिकल हिंदी चित्रपटांच्या कथा वटतात. पण या सगळ्या कथांचे शेवट किती वेगळे मांडलेत मतकरींनी! कदाचीत कथा नेहमीच्याच असतात पण आपण त्यांचा तसा कधी विचारच केलेला नसतो.
त्यांच्या प्रत्येक गूढकथेत असे नाविन्य कसं असत, हे एक गूढच आहे! सतत प्रयोग करण्याची वृत्ती व नाविन्य सांभाळणा-या त्यांचा कथा जितक्या प्रसिद्ध आहेत, तितकीच त्यांची नाटके आणि बालकथा. “घर तिघांचे हवे”, “चार दिवस प्रेमाचे” ही नाटकं तर खूप लोकप्रीय झाली.
त्या दिवशीच्या नाटकाच्या निमित्ताने रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचून सार्थक झालेल्या क्षणांची आठवण झाली, आणि त्याबरोबर आठवण झाली ती अजूनही वचायच्या राहून गेलेल्या कथांची. यादी वाढतचं आहे…..बघूया कधी जमते वाचायला ते!
*************************************************************************************************
छायाचित्रासाठी या संकेतस्थळाचे आभार.

August 8, 2007 at 12:55 pm
माझाही आवडते हे लेखक. मी त्यांची सर्व पुस्तके वाचली आहेत, त्यांच्या एकदा घरीही गेलो होतो
September 3, 2007 at 9:35 am
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर